मुंबई : ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच बहुजन समाजाच्या अनेक पिढ्या ज्ञानाच्या प्रकाशात उजळून निघाल्या त्यामुळेच कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात यावा,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कामाविषयी नितांत आदर आहे; मात्र त्यांच्या या कार्याची दखल अद्याप घेण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी करून कर्मवीरांच्या खऱ्या कार्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्रातून प्रथमच कर्मवीर अण्णांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून राज्य सरकारने केंद्राकडे कर्मवीर भाऊराव पाटील यांची भारतरत्नसाठी शिफारस करावी, अशी विनंती केली आहे.